(लघुकथा) खरं-खोटं
'व्वा, काय पार्टी आहे! चोप्राने आपल्या मुलीच्या लग्नात संपूर्ण शहराला आमंत्रित केले आहे असे दिसते.'
दिनेश लाल त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या विनोदला म्हणाला.'तुझं बरोबर आहे. डेकोरेशन आणि खाण्यापिण्यातच तीन ते चार लाख उडवले असावेत!'
विनोदनेही ते मान्य केले. 'आणि मग दुसरं काय तर! उदंड खर्च केलाय! कसलीच कमतरता नाही. वरची कमाई पगारापेक्षा दुप्पट आहे म्हटल्यावर...'
दिनेशने टिप्पणी केली, विनोदने आपला मुद्दा वाढवला, ‘आणि त्याच कमाईचा तर सगळा खेळ सुरू आहे आजकाल.’
'तेच तर! पण एक गोष्ट मान्य करावी लागेल की प्रत्येकजण मित्रांवर असा खर्च करत नाही.प्रत्येकजण फ्लॅट, दुकाने, गोडाऊन असं काही तरी घेऊन टाकतात.' दिनेशच्या आवाजात कौतुक होतं. 'आता भगवतीबाबूच घ्या, गेल्या वर्षी त्यांनी त्यांच्या मुलांचं लग्न केलं. पण जणू काय मुलगी पळवून आणल्यासारखं अगदी गुपचूप सगळं आवरलं. ते बँकेत चोप्रांपेक्षा चार-पाच वर्षांनी सिनियर आहेत, पण मुलखाचे कंजूष!'
'असं बोलू नकोस यार. केवळ ज्येष्ठतेतच नाही तर प्रतिष्ठेच्या बाबतीतही ते चोप्रांहून खूप वर आहेत, अगदी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आहे तो माणूस.' भगवतीबाबूंचे कौतुक करत विनोद म्हणाला.
'खरं-खोटं सोड... ते इतके उदारही नाहीत की ते नातेवाईक आणि मित्रांना आनंदाच्या प्रसंगी चांगली मेजवानी देऊ शकतील!आयुष्यात असे दोन-चार प्रसंगच येतात, जेव्हा तुम्ही समाजातील सर्वांसोबत हसून-बोलून आपला आनंद साजरा करू शकता.काहीही म्हण, पण चोप्रांसारखा दिलदार आणि मनमिळावू विरळाच.चल, त्यांचं अभिनंदन करूया!'' आणि दोघेही पुढे गेले.-मीरा उगरा
(अनुवाद- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली)
Comments
Post a Comment